१. आईवडिलांच्या पैशाने ख्यालीखुशाली करू नये. त्यात कसलाही पुरुषार्थ नसतो.
२. काहीही 'मिळवायचेच' असा विचार केला असेल तर,
"मला ते जमणार नाही"
निव्वळ या विचाराने प्रयत्न सोडू नयेत. कमीतकमी इमानेइतबारे प्रयत्न तरी करून पहावा म्हणजे "मी वेळ असतांनाही ते केलेच नाही" किंवा "काश मी एकदा प्रयत्न करून पाहिला असता" असे म्हणत पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही.
३. आयुष्यात चांगल्या प्रकारे स्थिरावल्यावरच लग्न करावे. स्थिरावणे (सेटल होणे) महत्त्वाचे आहे. कारण वेळ गेली की, इथेसुद्धा पश्चात्तापाशिवाय काहीही मिळत नाही. लग्न तर होते, पण वेळ गेल्यास मनासारखे करियर होत नाही.
४. निरिक्षण नेहमी तटस्थ राहून करावे. उघड्या डोळ्यांना दिसते सगळे तसेच असते, असे नाही!
५. आवश्यक त्या ठिकाणी "नाही" म्हणायला शिकावे. अन्यथा आयुष्यात नुकसान हे आपलेच असते.
६. एखादी व्यक्ती ज्या ठिकाणी रहाते त्यावरून त्याची जागा (योग्यता) ठरवू नये. महालात रहाणार प्रत्येक व्यक्ती हा प्रामाणिक, दयाळू, चांगलाच असेल असे नाही आणि झोपडीत रहाणारा प्रत्येक व्यक्ती चोर, गुंड, वाईटच असेल असेही नाही!
७. भुतकाळात फार रमून जाऊ नये. दुःखाच्या क्षणांना चिकटून राहिल्याने ते कमी होत नाहीत आणि सुखाच्या क्षणांना चिकटून राहिल्याने ते वाढत नाहीत. भविष्याचा विचार करून वर्तमानात जगणे कधीही चांगलेच!
८. स्वतःच्या जाती, धर्म, भाषा, संस्कृती, प्रांताबद्दल जरुर अभिमान बाळगावा मात्र इतर कुणाच्याही भावना दुखावल्या जातील असे वक्तव्य करू नये.
९. भरपुर चांगली पुस्तके वाचावीत म्हणजे मानवी मनाचे पैलू वाचता येतात. जीवनविषयक दृष्टिकोन उंचावत जातो. खर्या अर्थी जीवन समजते.
१०. कर्म हे सरतेशेवटी का होईना पण फळ देतेच. मग ते चांगले असो वा वाईट! त्यामुळे अंधारात केलेले वाईट कर्म कधीच उजेडात येणार नाही असे समजू नये. कर्म हिट करतेच.
११. कोणालाही रंग, उंची, शारिरीक व्यंग यावरून दुखवू नये. अशा बाबतीत विनोद, मस्करी करू नये. कोणाचेतरी मन दुखवून विनोद होत नसतो.
१२. कोणाकडूनही जास्त अपेक्षा करू नये. अपेक्षापुर्ती झाली नाही की, दुखावल्याशिवाय हातात काही मिळत नाही.
१३. शक्यतो रक्ताच्या नात्यातल्या व्यक्तीशी पैशाचा व्यवहार करू नये. पैसा माणसाला वाईट करतो. वितुष्ट निर्माण होते.
१४. कुठल्याही पर्यटनस्थळी फिरायला गेले असता, तिथे आपले नाव लिहू नये. ती आपली मालमत्ता नसते घरात स्वच्छता ठेवली जाते तशीच तिथेही ठेवणे कधीही चांगलेच.
"भारत माझा देश आहे "
हे फक्त शालेय प्रतिज्ञेसाठी लिहिलेले नसते. ते अशा वेळी आमलात आणायचे असते.
१५. शेवटचा मुद्दा सांगते. जास्त वेळ मोबाईल तोंडासमोर ठेवू नये.
Comments