top of page
  • श्री विनोद पंचभाई

|| श्री तुळजाभवानी कवच ||

देवी म्हणजे जगन्माता, देवी म्हणजे मूळमाता देवी , म्हणजे आदिशक्ती ,भाविकांनी अशा विविध स्वरुपात देवीकडे पाहिले आहे. देवीही आदिशक्ती म्हणूनच जेथे जेथे शक्तीचा संबंध येतो तेथे देवी स्वरूप म्हणून परिचीत आहे. किंबहुना देवीकडे विश्वामागची मूळ शक्ती म्हणून पाहिले गेले आहे. त्यामुळे देवी उपासना ही सार्वत्रिक आहे. नवरात्राचे नऊ दिवस हा या देवीच्या महोत्सवाचा कालखंड विशेष स्वरूपाचा म्हणून ओळखला जातो. या काळात देवीची विशेष प्रकारे आराधना केली जाते. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून तो आश्विन शुद्ध नवमीपर्यंत हानऊ दिवसांचा कालखंड हा नऊ रात्रींचा उत्सव, नवरात्र म्हणून ओळखला जातो.


देशात असा एकही कानाकोपरा नाही की जेथे देवीचा महोत्सव साजरा होत नाही! ती उत्तरेकडील वैष्णोदेवी असो की दक्षिणेची कन्याकुमारी, बंगालमधील दुर्गामहोत्सव तर प्रसिद्ध आहे. आसामातील कामाक्षीचा उल्लेख तेथील जनता माता म्हणून करतात. ते कामाक्षी म्हणत नाहीत.


देवी म्हणजे आदिशक्ती. त्यामुळे जे रामनाम रहस्य म्हणून कथन केले जाते त्या रामनामाची फोड करताना त्याच पद्धतीने केली जाते. राम हा शब्द अत्यंत पुरातन मानला गेला आहे. रा म्हणजे शक्ती, म म्हणजे शिव. पराशिव आणि पराशक्ती याचा एकत्रित बोध रामनामातून होतो. शब्दात पहिले स्थान शक्तीला आहे.


“ तुळजापूरनिवासिनी श्री तुळजाभवानी देवी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत. ”


श्री छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणादायी तलवार देणारी भवानी माता, शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरू श्री समर्थ रामदास यांनीतर तिचे रामवरदायिनी श्री तुळजाभवानी असे वर्णन केलेले आहे. महाराष्ट्रात सर्वत्र देवीचे भक्त ‘उदे उदे ग अंबाबाई’ गर्जनेत नवरात्र उत्सवसाजरा करीत असतात. श्री तुळजाभवानी मातेकडून आपणा सर्वांचे संपूर्ण रक्षण व्हावे, यासाठी तिचे एक स्तोत्र, त्याला तुळजा कवच असे म्हणतात. कवच म्हणजे संरक्षण यंत्रणा.


कविश्रेष्ठ वाल्मिकी ऋषींनी रचलेले रामरक्षा स्तोत्र सर्वश्रुत आहे. त्यामध्ये रामाने आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाचे रक्षण करावे म्हणून रामाची वेगवेगळी नावे प्रस्तुत केली आहेत. त्या सर्व नामांचा क्रम पाहिला तर सर्व रामायण डोळ्यापुढे उभे राहते. या देवीच्या स्तोत्रात देखील तुळ​जाभावानीने आपल्या मस्तकापासून पायापर्यंत सर्व अवयवांचे रक्षण करावे म्हणून देवीच्या वेगवेगळ्या नावांनी तिला आवाहन केले आहे. श्री तुळजाभवानी कवच स्कंद पुराणातील असून याच्या नित्य पठणाने सर्व संकटे दूर होतात. ज्यांचे कुलदैवत श्री तुळजाभवानी आहे त्यांना तर याचा विशेष लाभ होईल .हे मुळ स्तोत्र संस्कृतमध्ये आहे.

flickr.com

खास देविभक्तांसाठी संस्कृत ,तसेच मराठी अनुवाद येथे दिला आहे.


||श्री गणेशाय नम: ||


अथ​ध्यानम्


“शामां पूर्णेन्दुवदनाम् श्वेतांबरधरां शिवाम् | महामेघ निनादातां निर्वाते दीप वस्त्थिताम ||१||”


अथ​ध्यानम्


तुळजाभवानी देवीचे ध्यान असे आहे,पूर्ण चंद्राप्रमाणे मुख ,सावळा वर्ण असून पवित्र असे शुभ्र वस्त्र धारण केलेले आहे.विशाल मेघाच्या धीरगंभीर ध्वनित शांत वातावरणातील स्थिर दिव्याप्रमाणे तिचे रूप आहे.


“भुजाष्टकयुक्ता बाणां चापशूल गदा धरम् | खड्गशंख गदाचक्र वरदाभयधारिणीम् ||२||”


आठ हातांनी युक्त बाण, चाप, शूल, गदा धारण करणाऱ्या खड्ग, शंख, गदा व चक्र हाती धरणाऱ्या अशा व वर देणारी अभय मुद्राधारण करणाऱ्या तुळजाभवानीचे ध्यान करावे.


“श्री गणेशाय नमः अथ तुळजा कवचम् |


श्री देव्युवाच देवेश परमेशान भवतानुग्रहकारक तुळजाकवचम् वक्ष्ये मम प्रीत्या महेश्वर ||


शृणुदेवी महागुह्यं गुहतरं महत् || तुळजा कवचम् वक्ष्ये न देयं कस्याचित् ||”


श्री गणपतीला नमस्कार असो. आता तुळजा कवच प्रकट करतो. श्रीदेवी म्हणाली ,हे देवेश भक्तावर कृपा करणाऱ्या परमेश्वरा ,माझ्यावरीलप्रेमामुळे हे महेशा ,तू हे तुळजा कवच सांग .ईश्वर म्हणाले, हे देवी, मोठ्या गुढांपेक्षाही अतिशय गुढ असे हे महान तुळजा कवच मी सांगत आहेते कोणालाही(भलत्या सलत्याला) देवू नये.


“अस्य श्री तुळजाकवचमालामंत्रस्य श्री रामचंद्र ऋषी श्री तुळजादेवता |


अनुष्टुप छंदः | श्री तुळजाप्रसादसिद्धर्थेजपेविनियोगः |”


या तुळजा कवच माला मंत्राचा ऋषी म्हणजे स्वतः श्री राम व अधिष्ठात्री देवता श्री तुळजाभवानी आहेत.या कवचाचा छंद अनुष्टुप आहे.याकवचाचा विनियोग श्री तुळजादेवीचा प्रसाद प्राप्त होण्यासाठी आणि जप करण्यासाठी आहे.


“ श्री शंकर उवाच | तुळजा मी शिरः पातु भाले तू परमेश्वरी | नेत्रे नारायणी रक्षेत्कर्णमूले तू शांकरी ||१|| ”


श्री शंकर म्हणाले, तुळजादेवी माझ्या मस्तकाचे रक्षण ,नारायणी दोन्ही कर्णमुळांचे (कानांचे) रक्षण शांकरी करो.


“ मुखंपातु महामाया कण्ठम् भुवनसुंदरी | बाहुद्वयम् विश्वमाता हृदयंशिववल्लभा ||२|| ”


माझ्या मुखाचे रक्षण महामाया ,कंठाचे रक्षण भुवनसुंदरी करो, दोन्ही हातांचे रक्षण विश्वमाता, तसेच हृदयाचे रक्षण शिववल्लभा करो.


“नाभिं कुंडलिनीपातु जानुनी जान्हवी तथा | पादयो: पापनाशींच पादग्रम सर्वतीर्थवत् ||३|| ”


नाभिंचे रक्षण कुंडलिनी, गुडघ्याचे रक्षण जान्हवी, तसेच पायांचे रक्षण आणि सर्वतीर्थाप्रमाणे असणाऱ्या पायांच्या टोकांचे रक्षणपापनाशिनी करो.


“इंद्रायणी पातु पूर्वे आग्नेय्याम् अग्निदेवता | दक्षिणे नारसिंहीच नैऋत्याम् खड्ग धारिणी ||४||”


पूर्वेकडे इंद्रायणी तर आग्नेय दिशेकडे आग्नेय देवी रक्षण करो, दक्षिणेकडे नारसिंही, तर नैऋत्येकडे खड्गधारिणी रक्षण करो.


“पश्चिमेवारुणी पातु वायव्याम् वायुरुपिणी | उदीच्या पाशहस्ताच ईशान्ये ईश्वरी तथा ||५|| ”


पश्चिमेकडे वारुणी आणि वायव्येकडे वायुरुपिणी, उत्तरेकडे पाशधारण करणारी देवी, तर ईशान्येकडे ईश्वरी रक्षण करो.


“ऊर्ध्वंब्रह्मणिमे रक्षेद् दधास्या वैष्णवी तथा | एवं दशदिशोरक्षेत् सर्वांगे भुवनेश्वरी ||६|| ”


उर्ध्व दिशेकडे ब्रह्माणी तर अधो दिशेकडे वैष्णवी रक्षण करो, शरीरातील अशा दहा दिशांचे रक्षण भुवनेश्वरी करो.


“इदं तु कथितं दिव्यम् सर्वदेहिकम् | भूतग्रह हरं नित्य ग्रहपिडा तथैवच ||७|| ”


हे सर्व शरीराचे करणारे असे दिव्य कवच सांगितले. हे भूतबाधा आणि ग्रहपीडा कायम दूर करणारे आहे.


“सर्व पापहरेदेवी अंते सायुज्य प्राप्नुयात् | यत्र तत्र न ववतव्यं यदिछेदात्मनोहितम् ||८|| ”


हे सर्व पापांचा नाश करणाऱ्या देवी कवचाचे पठण करणाऱ्यास शेवटी सायुज्य मुक्ती प्राप्त होईल. स्वतःचे कल्याणकरू इच्छिनाऱ्यांने हेभलत्यासलत्या ठिकाणी सांगू नये.


“शठाय भक्तिहीनाय विष्णुद्वेषाय वै तथा | शिष्याय भक्तीयुक्ताय साधकाय प्रकाशयेत ||९|| ”


शठ भक्तिहीन तसेच विष्णूचा द्वेष करणाऱ्या कोणालाही हे कवच सांगू नये. शिष्य-भक्तियुक्त अशा साधकाला मात्र ते प्रकट करावे.


“दध्यात कवचमियुक्तम् तत्पुण्यं शृणुपार्वती | अश्वमेध सहस्त्राणि कन्याकोटी शचानिच ||१०|| ”


हे कवच कोणत्या प्रकारचे पुण्य देईल ते पार्वती तु सांग.(पार्वती म्हणाली)हजारो अश्वमेध केल्याचे,शंभर कोटी संख्यात्मक कन्यादानकेल्याचे पुण्य---


“गवाम् लक्षसहस्राणि तत्पुण्यं लभते नरः | अष्टम्यां चतुर्दश्यां नवम्यां चैक चेतसा ||११|| ”


ते पुण्य या कवच पठणाने माणसास प्राप्त होईल. अष्टमीला(शुक्ल), चतुर्दशीला आणि नवमीला एकचित्ताने या कवचाचा पाठ केल्यास हेपुण्य प्राप्त होईल.


“सर्व पाप विशुद्धात्मा सर्व लोक सनातनम् | वनेरणे महाघोरे भयवादे महाहवे ||१२|| ”


सर्व लोकांत सर्व पापांपासून शुद्धी देणारे, सनातन काळापासून चालत आलेले हे कवच आहे.


“जपेत्कवच मा देवि सर्वविघ्नविनाशिनी | भौमवार महापुण्ये पठत्कवचमाहितः ||१३|| ”


सर्व विघ्नांच्या नाश करणाऱ्या, हे देवी, महाघोर अशा अरण्यात असेच युद्धभूमीवर आणि भयंकर अशा वादविवादप्रसंगी तसेचमंगळवारी महापुण्यदायक अशा पर्वकाळी, एकचित्त करून या कवचाचा पाठ करावा.


“सर्वबाधा प्रशमनम् रहस्य सर्वदेहिनाम् | किमत्र बहुनोवतेन देवीसायुज्य प्राप्नुयात् ||१४|| ”


हे रहस्यमय कवच सर्व प्राणीमात्रांच्या सर्व प्रकारच्या बाधांचे निवारण करते. फार काय सांगावे त्या साधकाला शेवटी सायुज्य मुक्ती प्राप्त होईल.


“इति श्री स्कंद पुराणे सहयाद्री खंडे तुरजामहात्मे ईश्वर पार्वती संवादे श्री तुरजा कवचम् संपूर्णम् |

श्री उमारामेश्वरार्पणस्तु ”


असे हे स्कंद पुराणातील सह्याद्री खंडातील तुरजा महात्म्यातील ,ईश्वर पार्वती संवादातील, तुळजा कवच संपूर्ण झाले. श्री उमारामेश्वरास अर्पण असो.


हे तुळजाकवच रोज सकाळी म्हणावे.सर्व प्रकारच्या बाधांचे निरसन, संकटातून निवारण​ होईल.....

2,208 views0 comments

Recent Posts

See All

ध्यान (Meditation)

🙏 ध्यान म्हणजे काय? 🙏 ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत...

תגובות


bottom of page